खंडणी न दिल्याने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल? महिलेसह दोघांविरोधात गुन्हा……
नाशिकरोड शहरातील बांधकाम
व्यावसायिकाकडून ७५ लाखांची मागणी केल्यानंतर खंडणी न दिल्याने खोटा विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी महिलेने फिर्याद देत चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. राहुल राठी यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरोधात रविवारी उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केले.
बांधकाम व्यावसायिक राहुल रामचंद्र राठी व त्यांच्या भागीदारांचे कनक डेव्हलपर्स असून या फर्मच्यावतीने तपोवन रोड येथे ईश्वर प्रतिक ग्रँड हा गृह प्रकल्पातील युनिटची विक्री करण्यासाठी संशयित आदित्य अवस्थी व महिला सहकारी या दोघांनी राठी यांच्या कार्यालयात संपर्क साधून आपल्या प्रकल्पातील गृह प्रकल्प युनिटची आम्ही २ टक्के कमिशन नुसार विक्री करून देण्याचे ठरले. त्यानुसार दोघांनी काही युनिटची विक्री केली. मार्केटिंगसाठी संशयितांनी ३५ ते ४० लाख खर्च करून घेतला. या खर्चानुसार युनिटची विक्री होत नसल्याने दोघांना सूचनाही देण्यात आली होती मात्र संशयितांनी युनिट विक्रीसाठी घेतलेला स्टाफ काढून घेत हात वरती केले.
त्यानंतर राठी व भागीदारांनी पैशांची मागणी केली असता शाब्दिक बाचाबाची असता दोघे संशयित शिवीगाळ व धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर जानेवारी महिन्यापासून आदित्य अवस्थीसह महिलेने ७५ लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करू असे वारंवार धमकावले.
खंडणी न दिल्याने अखेर १४ फेब्रुवारीस महिलेने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला असे राठी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बांधकाम व्यावसायिक राठी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात आदित्य अवस्थी व त्याची महिला सहकारी यांच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहे.