कोट्यवधींचा गांजा खाक… नाशिक पोलिसांकडून ४ कोटी ८० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट…भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई.. उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली पुण्यात विल्हेवाट….
नाशिक अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने एक मोठी आणि धडक कारवाई पूर्ण केली आहे. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेला तब्बल ४ कोटी ८० लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांकडून यशस्वीरित्या नष्ट करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुप्ततेत आणि कडेकोट बंदोबस्तात पार पाडण्यात आली.
२,४०० किलो गांजा केला नष्ट
भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०३६/२०१० मधील एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(क), २९ अन्वये जप्त करण्यात आलेला २,४०० किलो गांजा आजच्या बाजारभावाप्रमाणे कोट्यवधींच्या घरात होता. हा संपूर्ण साठा ‘उच्चस्तरीय ड्रग्स विल्हेवाट समिती’च्या थेट देखरेखीखाली नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पुण्यात पर्यावरणाचे नियम पाळून विल्हेवाट
हा अंमली पदार्थांचा मोठा साठा नष्ट करण्यासाठी सुरक्षित ठिकाण निवडण्यात आले होते. २२ मे २०२६ रोजी पुणे येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, रांजणगाव’ येथे कडक सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन करून हा सर्व गांजा जाळून नष्ट करण्यात आला.

या मोठ्या कारवाईच्या वेळी अंमली पदार्थ विरोधी पथकातील (ANTF) आणि नाशिक पोलीस दलातील अनेक बडे अधिकारी उपस्थित होते.
ज्योतीप्रिया सिंह (विशेष पोलीस महानिरीक्षक, ANTF)
प्रविणकुमार पाटील (पोलीस उपमहानिरीक्षक, ANTF)
अनुज तारे (पोलीस अधीक्षक, ANTF)
किरणकुमार चव्हाण (पोलीस उपआयुक्त, गुन्हे, नाशिक शहर)
यांच्यासह न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा (FSL), मेरी, नाशिकचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त मा. किरणकुमार चव्हाण, यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बंडाळे, गणेश वडजे तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पठाण, सचिन अहिरराव यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत नाशिक शहर पोलिसांची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. शहरातून गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचा कडक संदेश या कारवाईतून गुन्हेगारांना देण्यात आला आहे.






