खाजगी बस ट्रक मध्ये भीषण अपघात….१० जण ठार….अनेक जण जखमी….
सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ शिर्डी कडे खासगी आराम बस आणि सिन्नर कडे जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस क्रमांक एम. एच. ०४ एस. के. २७५१ व शिर्डी कडून सिन्नर बाजूकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ४८ टी १२९५ यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे २५ ते ३० प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त मध्ये एकूण प्रवाशी-४५ होते त्यात १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे त्यात
ओळख पटलेले-०७ तर अनोळखी-०३ प्रवशी आहेत. मातोश्री हॉस्पिटल-०३, डॉ. साळुंखे हॉस्पिटल-०१, यशवंत हॉस्पिटल-१६ असे एकूण- २० प्रवाशांवर उपचार सुरू असून सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे. अपघात संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून या विषयी अधिक माहिती घेतली. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक येथे हलवून योग्य ते उपचार सुरू करावेत आणि हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देश केले आहेत.