कदम परिवाराकडून श्री जयरामभाई स्कूल संस्थेला दोन फळे (ग्रीनबोर्ड) वाटप; शिक्षणवर्धनासाठी स्तुत्य पुढाकार…
श्री जयरामभाई स्कूल संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कदम परिवाराच्या वतीने दोन नवीन फळे (ग्रीनबोर्ड) शाळेला प्रदान करण्यात आले. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना आधुनिक व सोयीस्कर शिक्षणसाहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी व शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री गणेश राजाभाऊ कदम तसेच पंचवटी अमृततुल्यच्या संचालिका आणि स्व. राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया गणेश कदम यांच्या पुढाकारातून ही देणगी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेल्या डॉ. अस्मिता देशपांडे यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या, “शाळेतून घडलेले आमचे विद्यार्थी आजही शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक जबाबदारी जपत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. कदम परिवाराने केलेली ही मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच मोलाची ठरेल.” तसेच त्यांनी नाशिक रोडच्या सर्वांगीण विकासासाठी अशा लोकप्रतिनिधींची समाजाला नितांत गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी सौ. सुप्रिया ताई कदम म्हणाल्या, “देशाचा उद्याचा नागरिक शिक्षक घडवतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे आहे. हे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी लवकरच विद्यार्थ्यांना ‘गुरुजी’ हा चित्रपट दाखविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.”
कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
