पार्किंग माफिया ची दहशत….. प्रवासी, दुकानदार, नागरिक दहशतीखाली…. कारवाईची मागणी…..
नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारोंच्या संख्येनं प्रवासही प्रवास करीत असतात. काही प्रवाशांचा रोजचा प्रवास असतो तर काहींचा अनेक दिवसांचा. बाहेर गावी जाण्यासाठी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासाठी नाशिकरोडला योग्य सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात बेकायदा वाहन तळ थाटून बसलेले पार्किंग माफिया यांचा कहर वाढला असून प्रवाशांना पार्किंग करण्यासाठी जबरदस्ती करतात आणि वाहने त्यांच्या वाहनतळात पार्क न केल्यास दमदाटी शिवीगाळ आणि गाड्या पंक्चर करण्याचे अनेकदा प्रकार झाले आहेत.
नाशिकरोड प्रवेश द्वारा जवळ एका पार्किंग माफिया मुळे वाहनधारकांना तसेच परिसरातील दुकानदारांना या माफियामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकरोड स्थानक परिसरात योग्य व्यवस्था केल्यास प्रवाशांची पिळवणूक थांबू शकते. प्रवेशद्वार जवळील पार्किंग माफिया जबरदस्तीने त्यांच्या खाजगी जागेत इच्छा नसताना पार्किंग करवून घेत असतात. खाजगी क्षेत्राबाहेर पण हे माफिया व्यावसायिकांना अडचण होईल अशी वाहने दुकानाबाहेर रस्त्यावर मनपाच्या जागेत प्रवाशांची वाहने पार्क करून अवाजवी पैसे घेऊन वाहने पार्क करतात.
यासर्व प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिक दहशतीखाली आहेत. सकाळी दुकानदारांची किंवा नातेवाईक वाहने लावून जरी बाहेरगावी गेली तरी त्यांच्या वाहनांना हे माफिया जबरदस्तीने पार्किंग रक्कम मागतात आणि पैसे न दिल्यास बिनधास्त गाड्या पंक्चर केल्या जातात. गाड्या पंक्चर करण्याचे दम देऊन शिवीगाळ देखील करण्याचे प्रकार घडतात.पार्किंग माफियाने काही गुंड प्रवृत्तीना पोसून ठेवले असून त्यांच्याकडून प्रवाशांना आणि व्यापाऱ्यांना दमदाटी करण्याचे काम हे गुंड करतात.
सकाळी बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी घाईत असतात म्हणून कुणी वादात पडत नाही पण या पार्किंग माफिया मुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.
दररोज या माफियांचा परिसरातील दुकानदारांना त्रास असतो पण आपले व्यवसाय सोडून कोण भांडण करणार कोण म्हणून दहशतीखाली व्यवसाय करणे भाग आहे. रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी तर या पार्किंग माफियांचा कहर असतो. परिसरात बाजारपेठ बंद असल्याने सर्रास रस्त्यांवर दुकानाबाहेर वेडीवाकडी वाहने लावून वाहनधारकांकडून पार्किंगची नावाखाली पैसे उकळले जातात.
या माफियांकडे अधिकृत परवानगी आहे का याचा तपास रेल्वे प्रशासनाने करावा आणि माफियांवर कारवाई करून प्रवाशांना आणि वाहनधारकांना होणारा थांबवावा अशी मागणी प्रवासी, नागरिक आणि परिसरातील दुकानदार करीत आहेत.